Friday, April 30, 2010

पाऊस...


पाऊस...
हल्ली पाऊस आला, की कससंच होतं मला,
अशाच तर पावसात पहिल्यांदा भेटले होते तुला...
पावसाचं काय रे, तो येतो आणि निघून जातो,
पण माझं काय,
आठवांचा तो सडा हूरहूर लावून जातो माझ्या जिवाला...

पाऊस असाही...
कधी कधी या पावसाचं गणितच मला कळत नाही,
नक्की असतं तरी काय याच्या मनात?
कधी काळ्याभोर नभातूनही येत नाहीत हे महाशय,
तर कधी अवचित चमचमत्या रथातून यांची स्वारी येते लख्ख उन्हात!!!

मी आणि पाऊस...

या पावसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे,
धरेच्या भेटीची याची ओढ बघा ना,
सूर्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून
हा तिला बिनधास्त भेटतो कसा,
हे मला अजूनही न उलगडलेलं कोडं आहे...

माझं आणि या पावसाचं नक्की काहीतरी वैर आहे,
तुझ्या निघायच्या वेळी यानं बरसावं असं वाटलं, तर त्यात काय गैर आहे?
पण नाही, माझ्या मनानुसार वागेल, तो पाऊस कसला?
बघ ना, काल तुला भेटायला निघताच हा अधाशासारखा बरसला !!!

तू आणि पाऊस...
तू आणि पाऊस- दोघंही सारखेच आहात...
कितीदाही भेटलात,तरी प्रत्येक भेटीत नवखे आहात...
प्रत्येक वेळी तुमच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडावंसं वाटतं,
कधी खळखळून हसावंसं, तर कधी मोकळं रडावंसं वाटतं....

Wednesday, April 28, 2010

हूरहूर...



सूर्य जसा मावळतो, दूर नदीच्या काठी,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...

डोळ्यात आजही जपतो, स्वप्न तुझ्यासम रंगविलेले,
आळवितो आजही सूर तुझ्या संगतीत गवसलेले...
नसलीस जरी तू जगी या, हे गाणॆ तुझेच ओठी,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...

वाजता कुणाचे पैंजण, उमटता तो मंजूळ नाद,
घुटमळते कानी माझ्या, तुझीच प्रेमळ साद,
क्षणार्धात का विरली जन्मोजन्मीची नाती,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...

स्वप्नांच्या गावी अजुनी असते तुझीच चाहूल,
तुझ्याच दिशेला आजही आभास वळवितो पाऊल,
का क्षणोक्षणीचे झुरणॆ, केवळ एका भेटीसाठी,
आठविती मग मजला त्या नदीकाठच्या भेटी...

राहूनच गेलं...

राहूनच गेलं...
थोडं बोलायचंय बाळा जरा ऐकून घेशील?
तुझ्या आईला बोलण्यासाठी थोडासा वेळ देशील?
तू जन्माला आलास ना तेव्हा खूप स्वप्नं पाहिली तुझ्यासाठी,
पण आमचंच चुकलं,
स्वप्नं आपली’ बघ,’माझी’ नाही, हे शिकवायचं राहूनच गेलं...
परिस्थितीची झळ तुला लागू नये यासाठी पुरेपूर झटलो,
पण आमचंच चुकलं,
आमच्या कष्टांची जाणीव ठेव, हे शिकवायचं राहूनच गेलं...
तुझ्या शिक्षणात कसलीच आडकाठी ठेवली नाही,
तुला खूप मोठा झालेलं बघायचं होतं ना आम्हाला,
पण तरीही एक चुकलंच,
तुझी महत्वाकांक्षा जपताना तुला माणुस अन माणुसकी शिकवायचं राहूनच गेलं...
आता झालाही आहेस खूप मोठा, स्वतःची सगळी स्वप्नं जगणारा,
पण तुझी एक भेटही आम्हाला स्वप्नासारखी वाटते;
जरी परक्यांच्या देशात असलास
तरी आम्ही कायम तुझे आहोत ही आठवण द्यायचं राहून गेलं...
गेलास तेव्हा मेल, मेसेज सारं काही सुरळीत होतं,
पण तुझ्या जवळ असण्याची सर नव्हती रे कशाला,
तेव्हाही चुकलंच, तुझ्या प्रगतीपुढे आमच्या भावनांना आवरलं,
पण म्हणून तुझं स्वातंत्र्य जप,पण आमचाही कधीतरी विचार कर, हे शिकवायचं राहून गेलं...
मान्य आहे की आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलं,
मुलांसाठी कष्ट करणं काही वेगळं नाही,
पण आम्हाला विसरु नकोस अशी शिकवण वेगळ्याने देणं तेवढं राहून गेलं...
जाण्यापूर्वी तुझे बाबा तुझेच नाव जपत होते,
तेव्हा बोलले, सगळं दिलं पोराला,
गेलेल्या क्षणाचं आणि माणसाचं महत्व सांगणं राहूनच गेलं...
जातानाही, खूप मोठा हो, हा निरोप ठेवून गेलेत, म्हणूनच हा खटाटोप करतेय,
आज तुझ्याकडे थोडा वेळ मागतेय,
बाकी बर्याच गोष्टी राहून गेल्या, जाता जाता खंत नको की चुका मान्य करायचं राहून गेलं...
तू खूप खूप मोठ्ठा हो, आशीर्वाद तर आहेच,
पण काही चुका अक्षम्य असतात,हेही शिकून घे जमलं तर;
कारण मला तर संधी मिळाली चुका मान्य करण्याची,
पण तसं झालं नाही तर ते पचवण्यासाठी लागणारं बळ तुला द्यायचंही राहूनच गेलं....